Menu

Wednesday, November 16, 2022

तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…

 

तरतूद इमर्जन्सी / आपत्कालीन पुंजीची…


 इमर्जन्सी / आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती  परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देतअशावेळी  मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की  त्याची कल्पनाही केलेली बरीअशावेळी घरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ मिळणारे विश्वासाहार्य कौश्यल्य (उदा. डॉक्टर्स, वकील) , सुविधा आणि व्यवस्थेची  (उदा. ऍम्ब्युलन्स किंवा सरकारी खातीवेळेवर असणारी उपलब्धता  इत्यादी घटाकांबरोबरच आपत्कालीन  परिस्थितीसाठी केलेली पैशांची तरदूत ही अत्यंत महत्वाची ठरते. बरेचजण 'मला काही होत नाही' च्या भ्रमात अशा इमर्जन्सी फ़ंडासाठी नियोजन करत नाहीत आणि मग वेळेवर होणारा मनस्ताप, धावपळ आणि पैशासंबधीत येणारे कटू अनुभव यांचा सामना त्यांना करावा लागतो. हे सर्व टाळता येऊ शकते का? एक उदाहरण बघुयात !  ही आमच्या परिचितांसोबत झालेली  सत्यघटना आहे.

"नमस्कार मी चित्रा ! माझासोबत घडलेली ही घटना साधारणतः 30 वर्षांपूर्वीची आहे.त्यावेळी माझे यजमान, नोकरीच्या निमित्ताने  इंडोनेशियाला कार्यरत होते.मी स्वतः कल्याण.टेलीफोनमध्ये नोकरीस होते. मोठा मुलगा पाच वर्षांचा व लहान काही महिन्यांचाच होता.घरात एक नणंद बाळंतपणासाठी आलेली होती तर दूसरी कॉलेजात जात होती.माझे सासरे निवृत्त झाले होते आणि सासूबाई गृहिणीं होत्या. येथे मुद्दामच सदस्यांचे सविस्तर वर्णन केले आहे जेणेकरून आमच्या सात सदस्यीय, आबालवुद्धांचा वावर असणाऱ्या घरातील त्यावेळेची कर्ती, जबाबदार मीच होते हे लक्षात यावे. साहजिकच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी वाहत होते. 

एके दिवशी अचानक सासूबाईंची प्रकृती बिघडली.त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आणि त्यांना ताबडतोब के. . एम. हॉस्पिटलमध्ये मध्ये नेण्यात आले. तिथे गेल्यागेल्या  लगेचच  डिपॉझिटची मागणी झाली तसेच  सहा बाटल्या रक्त ताबडतोब जमा करा असे सांगितले गेले. अंदाजे खर्चाचा आकडा पाहिल्यावर डोळ्यासमोर काजवे चमकले !! डोक्यात विचार सुरु झाले, आपण तात्काळ एवढे पैसे कोठून आणणार? कल्याणला ऑफिसमध्ये जाऊन  ऍडव्हान्स पगार घ्यायलासुद्धा  वेळ नव्हता. आमच्याकडील संपत्तीची ठेवयोजनेत केलेली गुंतवणूक मोडणे किंवा नातेवाईकांकडून जाऊन पैसे जमा करणे एवढाच पर्याय माझ्याकडे शिल्लक होता. पण त्यासाठीदेखील बँकेत जाणे किंवा वेळ साधता यावी म्हणून नातेवाईकांकडे धाव घेणे क्रमप्राप्त होते. सासूबाईंची  बिघडणारी परिस्थिती  आणि धावपळ करण्यासाठी असणारी मी एकटी हे पाहता, माझा खूपच गोधळ उडाला. वृद्ध सासरे, गरोदर नणंद आणि लांब अंतरावर कॉलेजात असणारी नणंद यांची काही मदत घेता येणे शक्य नव्हते !! शेवटी हॉस्पिटलमध्येच उभ्या दिसलेल्या परिचितांकडे साऊबाईंना ताब्यात देऊन मलाच बाहेर जाऊन  पैसे उभे करावे लागले ज्यात महत्वाचा दीड तास मोडला. नशिबाने साऊबाईंवर नंतर लगेच उपचार सुरु झाले !! "

 

मला ही परिस्थिती समजल्यावर ती टाळण्यासाठी काय करता येऊ शकले असते असा विचार आला आणि तोच तुमच्यासमोर मांडते आहे. अशी तणावग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी आपण पुढीलपैकी काही उपाययोजना करू शकतो का याचा विचार करूयात !

) इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड या  तरतुदीचा   विसरता आपल्या आर्थिक नियोजनात समावेश केला पाहिजे. त्यासाठी सोप्या  बचत / गुंतवणुकीचे माध्यम निवडावे.

) आपल्या कमीत कमी पुढील सहा महिन्यांच वेतन इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड म्हणून योजावे.  तसेच ते  अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून आपल्याला मानसिक, शारिरीक धावपळ टाळून ते लगेच हातात पाडता येईल.

) त्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे पासबुक/ ATM कार्ड यांची माहिती  घरातील सर्वाना हवी.

) घरातील कर्त्याच्या आपत्कालात घरचे पूर्ण  उत्पन्न बंद होऊ शकते. त्यामुळे घरातील सर्व कमवित्या व्यक्तींचा योग्य असा (उत्पनांच्या अनुरूप) अपघाती विमा ( Accident Insurance) आणि आरोग्य विमा    (Mediclaim / Health Insurance) असणे आवश्यक आहे. याद्वारे हॉस्पिटलचा खर्च , ऍडमिट कालावधीतील उत्पन्नाची हानी यांच्यासाठी विमा मिळतो.

) कर्त्याच्या  मृत्यू सारख्या दुर्दैवी घटनेत,  त्याचा योग्य प्रमाणात असणारा जीवन विमा  (Life Insurance) कुटुंबाचे आर्थिक पडझड कमी करू शकतो. असा विमा  वेळेवर उतरवावा आणि उत्पन्ना अनुरूप  वाढवावा.  

) घराचे आर्थिक चित्र  ( जसे मिळकती, विमा, बचत तसेच गुंतवणुकी, इतर उत्पन्ने, कर्जे, टॅक्स, इतर आर्थिक दायित्वे . ) कुटुंबियांना सुस्पष्ट असणे खूप महत्वाचे आहे. त्यांना योग्य माहिती नसल्यास, कष्टार्जित पुंजी बेनामी म्हणून पडून राहू शकते किंवा गैरमार्गाने लाटली जाऊ शकते. म्हणून घराचा आर्थिक लेखाजोखा तयार करावा आणि तो वेळोवेळी अद्ययावत करावा. त्यासंबंधी घरातील व्यक्तींना साक्षर करावे. यामुळे घरातील प्रत्येकालाच  अर्थभान ही येते. 

) घरातील सर्व सदस्यांसाठी असणारे सल्लागार ( उदा.डॉक्टर्स, वकील, आर्थिक तसेच विमा सल्लागार .) यांची संपर्क माहिती  जसे पत्ते, फोन नंबर घरातील सर्वाना ठावूक हवेत.        

      अशा काही तरतुदी केल्यास, काही सवयी लावल्यास, कुटुंबियांनाही आर्थिक निर्णय घ्याव्या लागणाऱ्या बाबतीत सामायिक करून घेतल्यास, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास आपण सक्षम होऊ शकतो.    

- लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी,

शब्दांकन सहाय्य्य :डॉरुपाली कुलकर्णी 

 

 

 

No comments:

Post a Comment